ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक ‘एकलव्यां’ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
– विश्वास नागरे पाटील (Jt Commissioner of police, Mumbai and Former Commissioner of Police, Nashik)
हे पुस्तक वाचायच्या अगोदर काही रिव्ह्यू आणि मित्रांची मत ऐकली, वाचली काहींचं ठाम मत होत कि जर UPSC / MPSC आणि इतर स्पर्धापरीक्ष्यांची तयारी करत असशील तरच वाच …. तेव्हा वाटलं कि यात जास्त या स्पर्धापरीक्ष्याबद्दल टेक्निकल रूपात माहिती दिलेली असेल पण म्हटलं परिक्षा देत नाही पण वाचायला काय हरकत आहे आणि वाचायला घेतलं, पुस्तक सरता सरता हे सर्व पूर्वग्रह गळून पडले इतर लोकांची पुस्तक वाचता ( आणि कधी कधी न वाचताही) दिलेली मत प्रत्येक वेळी १००% घ्यायचीच असं काही लिखित नियम नाही; त्यांच ऐका पण स्वतः अनुभवा आणि मगच पुस्तकाबद्दल व्यक्त व्हा.
हे पुस्तक म्हणजे एक खेड्यातून आलेल्या कधी हुशार तर कधी टवाळ अश्या मुलाचा गाव ते पोलीस विभागात सर्वोच पदापर्यंत पोहोचण्याचा प्रेरणादायक संघर्ष आहे. UPSC / MPSC च माहीत नाही पण तुम्ही आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात असाल आणि स्वप्न उराशी घेऊन जगत असाल तर हे पुस्तक नक्की वाचा, अतिशय साधी मांडणी आणि मैत्रीपूर्ण शब्दांचं लिखाण हे लेखक काहीतरी सांगू पाहतोय यापेक्षा एखादा मित्रच त्याच्या आयुष्याबद्द्ल सांगतोय असा अनुभव मात्र नक्की येईल.
खेड्यातून सुरु झालेला हा भावड्या (विश्वास पाटील यांना गावी भावड्या म्हणत म्हणून भावड्या) चा हा प्रवास बऱ्याच खाचखळग्यांचा कधी सुंदर आठवणी तर कधी कटू सत्य असा आहे, त्यांच्या या प्रवासात त्यांना प्रोत्साहन देणारी अनेक चांगली माणसं तर काही फोल ठरलेली नातीही तुम्हाला भेटतील, कोणताही संघर्ष हा फक्त बाहेरच्या जगाची नसतो तर तो स्वतःचा स्वतःशी, भावनिक आणि मानसिक अश्याही स्वरूपाचा असतो अश्या अनेक खाचखळग्यातून जो आपला मार्ग बनवतो, जिद्द आणि अपयश पचवत जो यशाकडे वाटचाल करतो त्याला यश सुद्धा स्वतःपर्यंत पोहोचायला थांबवू शकत नाही.
प्रत्येक व्यक्तीने विशेषतः विद्यार्थ्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं, खूप प्रेरणादायी आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या अनुभवांतून तुम्हाला शिकताही येईल आणि कधी प्रसंग आला तर त्याला समोर जाण्याच बळ सुद्धा नक्कीच मिळेल. स्पर्धापरीक्ष्यांना मला अनुभव नाही पण आयुष्याच्या स्पर्धेमध्ये धावायचं बळ या पुस्तकात आहे.
तुम्ही सुद्धा नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहा. 🙏🙏🙏

👌👌
LikeLiked by 1 person
धन्यवाद स्पंदन 🙏
LikeLiked by 1 person